जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
म्हणाले- ‘तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना?’, मंत्रालयातील आंदोलनावरुन मनसेप्रमुख संतापले
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज चक्क विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह दोन आदिवासी आमदारांनी मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर उड्या घेतल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार झिरवाळ यांच्या या निषेध आंदोलनावर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून टीका होत आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाच, आमदारांना, विशेष म्हणजे विधानसभा उपाध्यक्षांना अशाप्रकारे जाळीवर उड्या माराव्या लागत असतील तर सर्वसामान्यांचं काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध ?
— Raj Thackeray (@RajThackeray) October 4, 2024
सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य… pic.twitter.com/XDRzPVIT5E
आता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत कठोर शब्दात या नरहरी झिरवाळ यांच्या निषेध आंदोलनावर भाष्य केलंय. सत्ताधारी पक्षाचे आमदार उड्या मारून निषेध नोंदवणे, हा कुठला निषेध ?,असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केलाय.
तुमच्या सरदाराने तर सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या...
सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून 'जनतेच्या सेवेला सत्ता हवी', म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना? सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की. बरं मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?
आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, अशा शब्दात मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारणाऱ्या निषेध आंदोलानावर राज ठाकरे यांनी भाष्य केलंय.
महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे, त्या सर्कसीत तोफेच्या आत जाऊन नंतर तिकडून बाहेर जाळ्यात फेकला जाणारा माणूस आठवतोय? तसं या सगळ्यांचं झालं आहे, आता जनतेच्या तोफेच्या तोंडी जायची वेळ आली आहे, मग आपणच स्वतः जाळ्यावर उड्या मारा असा केविलवाणा प्रयत्न असल्याचं राज यांनी म्हटलंय. तसेच, राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहनही केलंय.