राजकारणातून मला संपवू नका, मी नसलो, तर तुम्हीही संपाल; अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा
Ashok Chavan on opponent : मला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करू नका, जर मी राहिलो नाही, तर तुम्हीही राहणार नाही, असे परखड मत माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मांडले. तर चव्हाण यांनी थेट विरोधकांवर निशाणा साधला आहे.
नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी हे विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राजकीय पटलावर मागे पडलेत, अशी चर्चा देखील सुरू झाली.
या ठिकाणी कॉंग्रेस उमेदवाराचा विजय झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठवली गेली. अनेकदा गावोगावी गेल्यानंतर मराठा आंदोलकांकडून देखील त्यांचा उघडपणे विरोध केला जाऊ लागला. त्यामुळे अशोक चव्हाण सद्या चिंतेत असल्याची प्रचिती त्यांच्या या विधानातून दिसून आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे एकेकाळचे बडे नेते राहिलेले अशोक चव्हाण यांनी साधारणत: लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. परंतु, अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यात त्यांना लोकसभेला म्हणावी तशी कामगिरी दाखवता आली नाही. अशोक चव्हाण यांचे पाहुणे असलेले विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण!
एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांना मला संपवू नका, कारण मी राहिलो नाही, तर तुम्हीही राहणार नाही, अशी भावना व्यक्त केली. तसेच मला संपवण्याएवढे मी कुणाचेही वाईट केलेले नाही.
अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, मला संपवण्याएवढे वाईट मी कुणाचेही केले नाही. एकवेळ टीव्ही बंद पडेल, पण विरोधकांची ही टीका थांबणार नाही. त्यांची टीका 24 तास सुरू असते. विरोधकांना माझे नाव घेतल्याशिवाय काही करमत नाही. विकासात्मक कामे करण्यासाठी जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे. आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत. पण विरोधकांना माझे नाव घेतल्याशिवाय करमत नाही. पण त्यांनी देखील माझा विरोध करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.