महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळ्या का झाडल्या? प्रकाश आंबेडकरांनी केला नवा दावा
Prakash Ambedkar on Mahatma Gandhi And Nathuram Godse : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला भवनात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळ्या झाडणाऱ्याचे नाव नथुराम गोडसे होते. हत्या केल्यानंतर नथूराम गोडसे याला फाशी देखील सुनावण्यात आली होती. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नथूराम गोडसे यांने महात्मा गांधींवर गोळ्या का झाडल्या? याबाबत काही दावे केले आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी कोणते दावे केले आहेत?
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महात्मा गांधींना 7 कोटींसाठी गोळ्या घालण्यात आल्या नाहीत. महात्मा गांधींना एकवेळा नाही तर पाचवेळा गोळ्या घालण्याच प्रयत्न करण्यात आला. तो कशासाठी झाला?
त्याचे कारण म्हणजे सवर्णांच्या हातामध्ये जो तिरंगा होता. तो महात्मा गांधींनी फिरत जाऊन इथल्या असणाऱ्या बहुजन समाजाच्या हातामध्ये दिला.
महात्मा गांधींनी बहुजनांची लिडरशिप या देशामध्ये उभी केली. या देशात लिडरशीप उभं करण्याचं श्रेय कोणाचं असेल तर ते महात्मा गांधींचं आहे. हे लक्षात घ्या, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटाने का केले स्वागत?
SC-ST आरक्षणात क्रिमी लेअर लागू करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट यांनी स्वागत केले आहे. क्रिमी लेअर लागू करून आरक्षण संपवण्याचे काम सुरु आहे. फुले - शाहू -आंबेडकरवाद्यांनो तुम्हाला SC-ST आरक्षणात क्रिमी लेअर लागू करण्याचा निर्णय मान्य आहे का? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
भारतीय उपखंड हा त्याच्या सांस्कृतिक विविधतेने नटलेला प्रदेश
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, गेल्या आठवड्यापासून बांगलादेशात बौद्ध आणि अल्पसंख्याकांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या येत आहेत. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारला मी विनंती करतो की, बांगलादेशातील बौद्ध आणि विविध स्वदेशी गटांसह सर्व धार्मिक अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. त्यांना सुरक्षिततेची खात्री द्यावी. भारतीय उपखंड हा त्याच्या सांस्कृतिक विविधतेने नटलेला प्रदेश आहे. या प्रदेशातील शांतता आणि सहअस्तित्वासाठी तसेच सांस्कृतिक विविधता साजरी करण्यासाठी धार्मिक सलोखा टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.