ठाकरेंनी फडणवीसांची अन् संजय राऊतांनी जेपी नड्डांची घेतली भेट, वंचितच्या दाव्याने महाराष्ट्र खळबळ
ठाकरे भाजप पुन्हा एकत्र येणार?, विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय भूकंप होण्याची वर्तविली शक्यता
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीने खळबळजनक दावा केलाय. संजय राऊत यांनी दिल्लीतील 7 डी मोतीलाल मार्ग याठिकाणी जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर दहा दिवसांनी देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास बैठक झाली, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे केला. यानंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नाशिक येथे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नागपूर येथे आदिवासी परिषद घेतली. राज्यातील अनेक संघटना एकत्र करत आहोत. आम्ही निवडणूक लढत आहोत. धनगर समाजाने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला, अशी परिस्थिती आहे.
सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. आम्ही काही धनगर समाजातील नेत्यांना सांगितले की कोर्टात जाऊ नका. धनगर आणि धनगड हे दोन वेगळे समाज आहेत. एकत्र आणता येत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जे करायला निघाले ते कायदेशीर नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात सव्वा लाख बोगस आदिवासी असल्याचे आढळले आहे. आदिवासींचे बजेट लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केले जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यावर काय म्हणाले आंबेडकर?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असून या दोघांची एक गुप्त भेट झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला. याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, त्यांच्या कडची माहिती त्यांनी पब्लिक केली. मागच्या निवडणुकीत संविधान आणि आरक्षणवाद्यांना फसविण्यात आले आहे. पुन्हा फसविण्यात येऊ नये, असे त्यांनी म्हटले.
ओबीसी आता एकांगी पडला
लक्ष्मण हाके यांचा आणि मराठा आंदोलकांचा पुण्यात वाद झाला. याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझ्याकडे जेवढी माहिती आहे ती वस्तुस्थितीला धरून नाही एवढेच मी सांगू शकतो. शरद पवार यांनी चार-पाच दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा आहे, असे म्हटले. लोकसभेत एकाही ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही. ओबीसी आता एकांगी पडला आहे, अशी परिस्थिती आहे. एकांगी पडला असताना त्यावर दबाव टाकला जातो आहे. बदनाम केले जात आहे. ओबीसी नेते जे पुढे आले त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात आहे. मी पुढे आलो असताना माझ्या बाबतीत पण तेच घडले होते, असे त्यांनी म्हटले आहे.
...तर मराठा आणि ओबीसीमध्ये मोठ्या दंगली झाल्या असत्या
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर अमरावतीच्या अचलपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभेनंतर 32 ठिकाणी दंगली झाल्याची माहिती आहे. जनतेचे आभार मानतो त्यांनी दंगली होऊ दिल्या नाही. तशाच पद्धतीने ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये दंगली व्हाव्या, असा प्रयत्न झाला. आरक्षण बचाव यात्रा आम्ही काढली नसती तर मराठा आणि ओबीसीमध्ये मोठ्या दंगली झाल्या असत्या, असे त्यांनी म्हटले.