बेलपत्र नदीपात्रात टाकायला गेलेल्या बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू
धुळे जिल्ह्यातील धक्कादायक घटना
Brother's sister's death due to drowning : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नदीपात्रात बुडून बहिण-भावाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. उत्कर्ष पाटील व वैष्णवी पाटील हे दोघे बहीण भाऊ पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सर्वपित्र अमावस्याच्या दिवशीच ही घटना घडल्याने गावावर शोककळा कोसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वपित्री अमावस्यानिमित्त गावा जवळच असलेल्या तापी नदी पात्रात दोघे भाऊ बहिणी हे बेल पत्र टाकण्यासाठी गेले होते. या नदीपात्राजवळ उत्कर्ष रमेश पाटील (वय 13) राहणार सोनेवाडी याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी त्याचीच बहीण वैष्णवी सुरेश पाटील हिने नदीपात्राकडे धाव घेतली. मात्र, भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याचा अंदाज न आल्याने ती देखील पाण्यात बुडाली, या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली असू न पोलिसांनाही पाचारण्यात करण्यात आलंय.
काकांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण...
नदीपात्रात दोघे चिमुकले बुडत असल्याचे पाहून सदर ठिकाणी वैष्णवीच्या काकांनी देखील दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाणी जास्त असल्याने त्या दोघांना वाचण्यात त्यांना अपयश आले. नदी पात्रातून बाहेर काढल्यानंतर दोघांनाही शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्या दोघा बहिण भावांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली आणि दोघांचा शोधकार्य सुरु केला असता घटनेच्या एक तासानंतर उत्कर्ष आणि वैष्णवी या दोघांचा तापी नदीपात्रात मृतदेह मिळून आला. तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत असतो यामुळे नदीपात्रात मोठं मोठ्या प्रमाणात खड्डे असून नदीपात्रातील वाळू उपसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे पाण्यातील अंदाज न आल्याने वैष्णवी आणि उत्कर्ष या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.