आता हे परिवर्तन येणार, ज्याने ज्याने सत्ता भोगली त्यांना उखडून काढण्याची ही वेळ - बच्चू कडू यांचा हल्लाबोल
खरा वंचित अन् आशेचे किरण निर्माण करण्याचे काम 'परिवर्तन महाशक्ती आघाडी' करेल, संभाजीनगरात पहिला मेळावा पार पडला
Parivartan Mahashakti Alliance : मी आजच्या सभेत शेवटी बोलत आहे म्हणून मी मोठा नेता आहे असं कोणी समजू नका. माझ्या नेत्याचा सन्मान झाला पाहिजे असे जर कोणाला वाटतं असेल ही आघाडी आजच येथेच संपवली पाहिजे. मुळात काँग्रेसवाल्यांचे कोथळे काढण्यासाठी ही सभा आहे. ज्या गडावर भेटतील त्या गडावर मारू, असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज (दि.26) तिसऱ्या आघाडीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
धर्मा-धर्मात भिडवणे ही यांची पॉलीसी
बच्चू कडू म्हणाले, काँग्रेसने स्वामीनाथन आयोग आणला पण शिफारस मान्य केली नाही. मग मोदी आले पण त्यांनी देश खड्यात घातला. आम्ही सतरंजी उचलणारे आहोत, पण ज्यांच्यासाठी सतंजरी टाकल्या त्यांचं वाटोळं केल्या शिवाय हा कार्यकर्ता राहणार नाही. धर्मा-धर्मात भिडवणे ही यांची पॉलीसी आहे. बाप मेला तरी चालेल पण नेता जीवंत राहिला पाहिजे. एका कलेक्टरवर साडेसात लाख खर्च होतात आणि तो कार्यालयातून उठत नाहीत.
काँग्रेसला वाटते दलित मुस्लिम आमच्यासोबत
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, लोक जातीपातीत गुंतवून ठेवले आहेत, एका एका मतदारसंघात 100 कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. आम्ही छत्रपतीचे भक्त आहेत. ज्याने भाव दिला नाही त्यांना आमचे मत नाही. काँग्रेसला वाटते दलित मुस्लिम आमच्यासोबत आहे आणि भाजपला वाटते हिंदू आमच्यासोबत आहे, पण आमच्यासोबत शेतमजूर आहे. डोक्यात बदलाची आग आहे, आणि बदला घायचा आहे. आमच्यावर आरोप केले जातील, भाजपची बी टीम म्हटले जाईल.
महायुतीसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांची सहभागी पक्ष पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रहारचे बच्चू कडू, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी उपस्थित होते. यावेळी तिन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीसह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. तिसऱ्या आघाडीचे नेते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीत आणखी कोण सहभागी होणार का? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय, तिसऱ्या आघाडी निवडणुकीला सामोरे गेल्यास कोणाला फटका बसणार याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत.