पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंनी उपस्थित केले सवाल
पुणे : बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला असून याप्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. आरोपी अक्षय शिंदेला आज न्यायालयातून नेत असताना मुंब्रा बायपासवर पोलिस आणि अक्षय यांच्यात हातापायी झाली. त्यामध्ये, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेत एपीआय निलेश मोरे यांनीही गोळी लागली असून त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेनंतर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनीही पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे.
साधरणत: पोलिसांची बंदूक लॉक असते, मग आरोपी अक्षय शिंदेंनी बंदुकीचा लॉक तोडून पोलिसांवर फायरींग केली का, असा सवालही सरोदे यांनी उपस्थित केला आहे.
बदलापूर आरोपी एन्काऊंटरप्रकरणात असीम सरोदे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारला आणि पोलिसांना सवाल केले आहेत. ''बदलापूर घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीच्या व तिच्या परिवाराच्या बाजूने वकीलपत्र दाखल केल्यापासून मी एक वेगळाच दबाव बघतोय.
आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणे आवश्यक असतांना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आले?, पोलिसांची बंदूक साधरणतः लॉक असते ती आरोपीने कशी वापरली?, असे सवाल वरिष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी उपस्थित केले आहेत. कारण, आरोपी अक्षय शिंदे यांने पोलिसांची बंदूक हिसकावल्यानंतर त्याचा लॉक तोडून पोलिसांवर फायरींग केली का,'' असा सवालही सरोदे यांनी उपस्थित केला आहे.
अक्षय शिंदेची हत्या तर केली नाही ना?
एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गरड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? आणि ते जरी घडलं असेल तर पोलिसांनी त्याला आटोक्यात आणून का पकडता आलं नाही? हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पोलिस आणि राज्याच्या गृहखात्यात नक्की चाललंय तरी काय? बदलापूर प्रकरणात याआधीच पोलिसांवर प्रकरण दडपण्याचे, गुन्हा नोंदवण्यास उशीर करण्याचे गंभीर आरोप झालेले आहेत.
या प्रकरणातील शाळेचे संस्थापक तुषार आपटे यांचे भाजपाशी संबंध असून तो अजूनही फरार आहे. त्याला अजून पोलीस का पकडू शकले नाहीत? आरोपीच्या आईने आणि भावाने दिलेले जवाब कसं दुर्लक्षित करता येतील? त्यामुळे जागच्या जागी हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी आणि या प्रकरणाचे धागे दोरे ज्यांच्या दिशेने जात आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी तर अक्षय शिंदेची हत्या करण्यात आलेली नाही ना? याची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजलेत, पण राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे सत्ताकारणात व्यग्र आहेत. खरं तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा दिला पाहिजे.
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
अक्षय शिंदे प्रकरणामुळे सत्तेच्या मागे जाणारे पोलीस पाहायला मिळत आहेत. एक आरोपी पोलिसांची बंदूक लंपास करतो हे किती गंभीर आहे सदरक्षणाय खलनिग्रहनाय याचा देखील पोलिसांना विसर पडायला लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलंय.