शिंदे-फडणवीस-अजितदादांनी त्यांच्या कोट्यातून आम्हाला 12 जागा द्याव्यात - रामदास आठवले
प्रकाश आंबेडकरांना दिली महायुतीत सामील होण्याची मागणी; फडणवीसांचे केले कौतुक
Ramdas Athawale on Mahayuti seat allocation : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज महायुतीकडे विधानसभेसाठी जागांची मागणी करत आकडाच सांगितला. तर प्रकाश आंबेडकरांना महायुतीत येण्याची ऑफर दिली. तर पुढे बोलताना देवेंद्र फडणवीसांचे कौतुक देखील केले. आठवले यांच्या या गुगली विधानामुळे आगामी काळात महायुतीमध्ये जागावाटपावरुन वादाची शक्यता वर्तविली जात आहे. आठवले हे नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधीही लागण्याची शक्यता आहे. अशातच महायुती असो किंवा महाविकास आघाडी यांच्याकडून जय्यत तयारी केली जात असून जागावाटपाबाबत चर्चासत्र सुरू झालेले आहेत. यासर्व घडामोडी घडत असताना महायुतीचा भाग असलेले रामदास आठवले यांनी देखील विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला जागा दिल्या जाव्यात अशी मागणी केली. लोकसभा निवडणुकीत आम्ही आग्रह केला नाही, मात्र, राज्यातील विधानसभा निवडणुकीत आम्हाला केवळ भाजपच्या कोट्यातूनच नव्हे तर शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या कोट्यातून देखील जागा मिळायला हव्यात, अशी मागणी केली.
आठवलेंनी किती जागा मागितल्या?
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला राज्यात म्हणावे तितके यश मिळालेले नाही. आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या, मात्र मिळाल्या नाहीत. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला 12 जागा द्याव्यात. विदर्भात किमान 4 जागा द्याव्या. महाराष्ट्रात आम्ही 18 जागांची यादी केली आहे. त्यापैकी 12 जागा द्याव्या. आम्हाला भाजपच्या कोट्यातून मानू नये, तर भाजप, शिंदे आणि अजित दादा तिघांनी आम्हाला त्यांच्या कोट्यातून 4 - 4 जागा द्याव्या, म्हणजे आम्हाला 12 जागा मिळतील. येणाऱ्या एनडीए सरकारमध्ये आम्हाला मंत्री पद द्यावे, तसेच 2 महामंडळ दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चतुर नेते आहे. ते आमची ताकद ओळखतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
काहीही अवास्तव मागणी केली नाही
महायुतीत आधीच तीन पक्षात जागांची मारामारी असताना तुम्हाला 12 जागा आणि प्रत्येकाच्या कोट्यातून 4 जागा कशा मिळणार या प्रश्नावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, महायुतीत सर्व पक्षांच्या जागांच्या मागण्या आहेत. मी काही अवास्तव मागणी केलेली नाही. मी 12 जागा मागितल्या आहे. चर्चेत याबद्दल काही कमी जास्त होऊ शकते. या जागा मात्र आम्ही आमच्या चिन्हावर लढवू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगळ्या चिन्हावर लढल्या तर चालतील, मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्ही आमच्या चिन्हावर लढवू या मतावर आठवले यांनी विश्वास व्यक्त केला.
आंबेडकरांनी सकारात्मक विचार करावा
प्रकाश आंबेडकर यांनी अनेक निवडणूक लढून ही त्यांच्या जागा निवडून येत नाही. त्यामुळे मी एकदा म्हणालो होतो, की त्यांनी एनडीएमध्ये यावे, त्यांच्या जागा ही निवडून येतील. त्यांना मंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करेल. 1990 मध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते, तर आमच्या किमान दहा-बारा जागा निवडून आल्या असत्या आणि उपमुख्यमंत्री पद आम्हाला मिळालं असतं. मात्र, तेव्हा ते आमच्या सोबत आले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी थोडं सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे, असेही आठवले म्हणाले.