जरांगेंच्या आंदोलनाचे बोलवते धनी दुसरेच: भाजप नेते नरेंद्र पाटलांचे विरोधकांकडे बोट
म्हणाले- फडणवीसांच्या काळात SEBC चे 12% आरक्षण मिळाले, जरांगेंनी गैरसमज दूर केला पाहिजे
Narendra Patil On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल द्वेष करत आहेत. यावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी भाष्य केले आहे. जरांगे यांच्या आंदोलनामागे काही सत्तेबाहेरील सूत्रधार आहेत, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मनोज जरांगे यांच्या मनातील गैरसमज दूर होतील, असा दावा नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला एसईबीसीमधून 12 टक्के आरक्षण मिळाले, असा दावा देखील नरेंद्र पाटील यांनी यावेळी केला. मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना तसेच सारथी सारखी संस्था काढली. या दोन्हींमधून मराठा समाजातील युवकांना फायदा झाला आहे. फडणवीसांनी एवढे चांगले काम करून देखील मनोज जरांगे त्यांच्याबद्दल द्वेष व्यक्त करत असतील, तर त्यामागे कोणी बोलावता धनी असला पाहिजे, असे नरेंद्र पाटील म्हणाले.
जरांगेंच्या आंदोलनामागे सत्तेबाहेरील सूत्रधार
नरेंद्र पाटील म्हणाले की, जे सत्तेत नाहीत ते मनोज जरांगेच्या आंदोलनामागचे सूत्रधार असू शकतो. मग ते कुणीही असू शकतात. काही अतृप्त आत्मा असतील ज्यांना मराठा समाजाचे प्रश्न झुलवत ठेवायचे असतील. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी भापज-शिवसेना सत्तेवर होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विराधी पक्षात होते. मात्र, सध्या एकनाथ शिंदे भाजपसोबत आहेत तर विरोधी पक्षात ठाकरेंचा गट आहे तो असू शकतो. अजित पवार सत्तेत आहेत तर शरद पवारांचा गट त्यामागे असू शकतो, असे म्हणत नरेंद्र पाटील यांनी विरोधकांकडे बोट दाखवले आहे.
...तर फडणवीसांबाबतचा गैरसमज दूर होईल
नरेंद्र पाटील म्हणाले की, मनोज जरांगे हे आंदोलनाच्या आधी महामंडळाबाबतच्या कामासाठी मला भेटायचे. त्यांची कामेही आम्ही करत होतो. ते नेहमी सामान्य कार्यकर्ता म्हणून न्याय मिळवण्यासाठी काम करत होते. आता त्यांच्या आंदोलनाचे चळवळीत रुपांतर झाले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचे वेगळेपण दाखवले. आता आगामी विधासभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार उभे करणार असे ते म्हणत आहेत. मात्र कुणाच्या विरोधात उभे करणार याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले नाही. या सगळ्यामागे देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले जात आहे. यामागे असणारे सूत्रधार मनोज जरांगेंच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या मनातील फडणवीसांबाबतचा गैरसमज दूर होईल, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.