वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने; रास्ता रोको, जरांगे संतापले, वाचा दिवसभर काय झालं
Maratha vs OBC : जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावालगत मराठा ओबीसी आंदोलक आमनेसामने आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्यामुळे जालन्यात तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. वडीगोद्री पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. दुसरीकडे वडीगोद्री येथील ओबीसी आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केल्याने या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रात्रीपासूनच या भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीचा रहदारीचा रस्ता एकच
सध्या वडीगोद्रीमध्ये तणावाची परिस्थिती आहे. मराठा आंदोलकांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली. यांचं मुख्य कारण म्हणजे अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीचा रहदारीचा रस्ता एकच आहे. मराठा आंदोलक अंतरवाली सराटीकडे जात असताना ओबीसींकडून रस्ता रोको करण्यात येतोय. त्यामुळे मराठा ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याचे चित्र आहे. मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याची परिस्थितीला हातळण्यासाठी पोलिस यंत्रणा देखील या ठिकाणी सज्ज झालेली आहे.
जरांगे संतापले , दंगल झाली तर फडणवीस जबाबदार
एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे उपोषणकर्ते जरांगे पाटील यांनी पुन्हा भुजबळ आणि फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, दंगल घडली तर भुजबळ, फडणवीस हेच जबाबदार आहेत. रस्ता अडवून चालनार नाही. आम्ही वडीगावची आम्ही इज्जत करतो, दादागिरी करायची नाही. अंतरवालीमध्ये येणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांनी ज्या रस्त्याने आले त्याच रस्त्याने जायचे. काही अनुचित प्रकार घडला आणि दंगल झाली तर याला फडवणीस आणि भुजबळ जबाबदार राहतील. भुजबळांचे ऐकू नका मराठ्यांनी शांततेत यायचे. विनाकारण आग्यामोहळ उठवू नका, मग ते थांबत नसते, असाही जरांगे पाटील यांनी इशारा दिला.
बीड जिल्ह्यात आज बंदची हाक
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा समाज बांधव आंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत. आजचा हा बंद शांततेत असणार असल्याचं मराठा समन्वयकांकडून सांगण्यात आलं. बीड जिल्हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याच अनुषंगाने आज जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त असणार आहे.