48 तासात अध्यादेश निघाला नाहीतर पाण्याचा थेंब ही घेणार नाही - हजारे, गोयकर यांचा इशारा
धनगर समाजाचे 17 व्या दिवशीही आमरण उपोषण सुरु
Dhangar community also fast on 17th day : खिल्लारे कुटुंबियांचे बोगस जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावे, या मागणीसाठी धनगर समाजाने लातूर मधून निर्णायक लढ्याची हाक देत आंदोलन सुरू केले आहे. सामाजिक कार्यकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यानी आमरण उपोषणास सुरुवात केली धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले एसटी आरक्षण तात्काळ लागू करावे, अन्यथा पुढील ४८ तासात अध्यादेश निघाला नाही तर पाण्याचा थेंब ही घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी आमरण उपोषणाच्या १७ व्या दिवशी घेतला आहे.
९ सप्टेंबर पासून मल्हारयोद्धा अनिल गोयकर, चंद्रकांत हजारे यांनी आमरण उपोषण सुरु केले असून उपोषणाचा आज १७ वा दिवस आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज मागील ७० वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली, अनेक मोर्चे झाले आणि उपोषणे झाले;
अनेक वेळा साखळी उपोषण, रास्तारोको, मुंडण आंदोलन, निवेदने, सभा, रेल रोको आंदोलने झाले तरी सुद्धा सत्ताधारी विरोधी पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे.
आता सत्तेवर असलेल्या शिंदे सरकार कडून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. त्यानंतर धनगर समाजाच्या सुरु असलेल्या उपोषणाला समाजातून पाठिंबा देत राज्यभरात रस्ता रोको, निवेदन आंदोलन करण्यात येत असून कांही ठिकाणी धनगर समाज आक्रमक झालेला ही दिसत आहे. ४८ तासात जीआर निघाला नाही तर पाण्याचा थेंब ही घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी - लोकप्रतिनिधी हे आंदोलन स्थळापासून जात आहेत परंतु भेट देत नाहीत. राजकीय पक्षाकडून नेहमीच धनगर समाजाच्या मतांचा सत्तेत येण्यासाठी वापर केला आहे.
निवडणुक जवळ आली की हे राजकीय लोक झोळी घेऊन मताचा जोगवा मागायला येतात त्यात मंत्री संजय बनसोडे यांचे घर व आमदार रमेश कराड यांचे कार्यालय हे उपोषणस्थळावरून हाकेच्या अंतरावर आहेत ते याच रस्त्याने ये जा करतात, खासदार डॉ.शिवाजी काळगे, आमदार अमित देशमुख, आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ.अभिमन्यू पवार, आ.बाबासाहेब पाटील, आ.धीरज देशमुख हे शहरात सर्व कार्यक्रमाना उपस्थिती लावतात परंतु उपोषणस्थळी भेट देत नाहीत. वेळोवेळी असंच होत राहिले तर समाज तरी किती दिवस गप्प बसणार आहे? आगामी विधानसभा निवडणुकीत यांना धनगर समाज त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. आंदोलक -- गोयकर, हजारे