22 सप्टेंबर पासून मुरुड अकोला-येडशी चौपदरीकरण मार्गासाठी नागपुरात उपोषण - संजय शेटे
पत्रकार परिषदेत म्हणाले- आतापर्यंत 122 जणांचा बळी, अनेकांची कुटुंब उद्धवस्त; तरीही निगरगठ्ठ प्रशासनाला जाग नाही
लातूर / प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून लातूर - मुरुड - टेंभुर्णी रस्त्याकडे पाहिले जाते. मराठवाड्यातील या महत्वपूर्ण मार्गाचा मागील २० वर्षांपासून ज्वलंत प्रश्न सुटला नाही. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.
122 जणांचा या मार्गावर मृत्यू
पुढे बोलताना शेटे म्हणाले, हा रस्ता इतका खराब झाला आहे की, आत्तापर्यंत १२२ जण या रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. १२२ कुटुंब उध्वस्त झाले आहेत. या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे वाहनाची, जीवनाची, इंधनाची हानी होत आहे, तरिही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. हा प्रश्न वर्षानुवर्ष खितपत पडला आहे. ना. नितीन गडकरी यांनी तीन तीन वेळेस आश्र्वासन देऊन देखील या महामार्गाचा प्रश्न सुटत नाही. या रस्त्याचा डी पी आर देखील मंजूर करण्यात आला आहे.
प्रशासनात उदासिनतेमुळे प्रश्न सुटत नाही
तरिही प्रशासनातील उदासीनतेमुळे हा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नाही. त्यामुळे या अडचणीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी रविवार (दि.२२) रोजी सकाळी १० वाजून १० मिनिटापासून दिक्षाभूमी येथे अभिवादन करून थेट नागपूर येथे संविधान चौकात आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष संजय शेटे, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, कृषी उत्त्पन्न बाजार समिती चाकूरचे सभापती निळकंठ मिरकले, लक्ष्मीकांत तवले यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर मार्गावरील टोलधारकांसोबत लोकप्रतिनिधींचेच साटेलोटे; 2029 पर्यंत महामार्ग होऊ न देण्याचा घाट
लातूर - सोलापूर- टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाके सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांचे असून ते बंद पडू नये म्हणून कदाचित लातूर-मुरुड-टेंभुर्णी मार्गावरील मुरुड अकोला-येडशी डांबरीकरण व चौपदरीकरनाला मंजुरी मिळत नाही, या टोल नाक्यांची मुदत 2029 पर्यंत आहे. त्यामुळे 2029 पर्यंत हा महामार्ग होऊ न देण्याचा घाट घातला जात आहे. केवळ लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा महामार्ग रखडला आहे.असा आरोप देखील संजय शेटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.