Manoj Jarange Patil hunger strike stop : नवव्या दिवशी अखेर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित
मराठा समाजाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नसल्याचा दिला इशारा, राजकीय नेत्यांच्या रॅलीत सहभागी न होण्याचे केले आवाहन
Manoj Jarange Patil hunger strike stop : मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या 9 व्या दिवशी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाच्या वतीने मला उपोषण न करण्याचा आग्रह करण्यात आला होता.
माझ्या माय माऊल्यांनी त्यासाठी मला वारंवार विनंती केली. त्यामुळे आपण उपोषण स्थगित करत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर ज्यांनी - ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला, त्यांना सोडणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज एकच असल्याचा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या निमित्ताने मराठा समाज एकत्र आला, हे एक चांगले झाले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आपल्या आंदोलनामुळे मुलींना मोफत शिक्षण मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला.
नेत्यांना आणि त्यांच्या मुलालाच मोठा करू नका. तुमच्या लेकींचे वाटोळ करू नका, मुलींला धोका देऊ नका, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. एकाही नेत्याच्या सभेला जायचे नाही, असे आवाहन देखील त्यांनी केले. घरी बसून रहा पण नेत्यांच्या सभेला आणि प्रचाराला जाऊ नका, असे आव्हान देखील त्यांनी केले आहे.
मराठा समाजाने कोणत्याही नेत्याच्या सभेला जाऊ नये
मराठा नेत्यांनी एकमेकांना साथ द्या, मराठा समाजाने कोणत्याही नेत्याच्या सभेला जाऊ नका, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. मराठा समाजातील माता बहिणी मोठ्या प्रमाणात आंतरवाली सराटी येथे येत आहेत. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाचे हाल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर गावाच्या देखील काही समस्या आहेत.
माता भगिनींनी मला उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे आता आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला आहे, त्यांनाही इशारा देत त्यांनी सुरुवात केली आहे, त्याचा शेवट मराठाच करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.